Sunday, January 17, 2010

Teach for India!

मिलिंद काल जवळपास सात-आठ वर्षांनी भेटला. एक वर्षाने सिनियर होता मला कॉलेजमध्ये. Extracurricular activities मध्ये भाग घेताना त्याची ओळख झाली होती. इंजिनीयरिंग संपलं. सगळेच करतात त्याप्रमाणे तो MS करायला US ला गेला आणि इतर मित्रांकडून अधनंमधनं त्याची खबर मिळायची.

पंधरवड्यापूर्वी कॉलेजमधले मैत्र भेटलो होतो तेव्हा तनुश्री म्हनाली की मिलिंद दोन-तीन वर्षांपूर्वीच भारतात परत आला. त्यानं बंगलोरला जॉब घेतला होता. पण सध्या तो मुंबईतच आहे आणि सध्या तो Teach for India मधून शाळामास्तर झालाय.

माझ्या डोळ्यासमोर पटकन एक sketch उभं राहिलं. एका संपन्न मारवाडी घरातला मुलगा. इंजिनीअर झाला, US ला गेला, MS केलं. आता चांगली मारवाडी मुलगी बघून पंचतारांकित लग्न करायचं आणि झालंच तर family business जॉइन करायचा. आता हे काय भलतच.

मग काल जेव्हा मिलिंद भेटला तेव्हा सगळी कहाणी ऐकली. एखाद्या मूलभूत कार्यात प्रत्यक्ष सहभागी व्हायची इच्छा तो नेहमी घरच्यांसमोर बोलून दाखवायचा. मग एके दिवशी Teach for India ची जाहिरात त्याला त्याच्या आईने दाखविली. महाशय जॉइन देखिल झाले. ज्या वयात पैश्याच्या मागे धावायचं तो मोह किमान दोन वर्षं बाजुला ठेवून मुनिसिपाल्टिच्या कुठल्याशा प्राथमिक शाळेत हा माणूस सध्या मास्तर म्हणून काम करतोय.

तु निर्णय घ्यायला किती वेळ घेतलास? घरच्यांनी निर्णय कसा स्वीकारला? दोन वर्षांनंतर काय? मी, रावी, नयन, गौरी, विवेक, काजल, श्वेता - आमच्या या सगळ्या प्रश्नांची त्याने ज्या उत्साहाने आणि मनापासून उत्तरं दिली त्यावरूनच खात्री पटली की आपल्या मनाने मनापासून एखादा वसा स्वीकारला की sky is the limit!

मिलिंद Teach for India मार्फत जे काम करतोय त्याच्या details लवकरच. सध्या मी दादरमधल्या शिंदेवाडी महानगरपालिकेच्या इंग्रजी माध्यामाच्या इयत्ता तिसरीचे वर्गशिक्षक श्रीयुत मिलिंदभैया यांना भेटायचा प्लान करतो आहे.

श्रीयुत मिलिंदभैय्या, I am proud of you!

Sunday, November 15, 2009

माननीय राजसाहेब

माननीय राजसाहेब,

खरं सांगायचं तर आमची पिढी माननीय आणि साहेब ह्या दोन्ही प्रकारांना जुमानत नाही. पण निदान जुजबी ओळख होईपर्यंत जुन्या जोखडांचं वेड पांघरायला आमची ना नाही.

सर्वप्रथम तुमचं अभिनंदन. तुमच्या मनसेचे तेरा उमेदवार विधानसभेवर निवडून आले. अभिनंदन मात्र तुमचंच कारण एक राजकीय पक्ष म्हणून मनसे अभिनंदनास पात्र आहे किंवा नाही हे तुमच्या तेरा आमदारांची कारकीर्दच ठरवेल.

आम्ही तुम्हाला मनसे जन्माला आल्यापासून नव्हे तर शिवसेनेचा भावी firebrand म्हणून तुमची गणना होत होती तेव्हापासून पाहतोय. कोणत्याही राजकारण्याच्या मागे गतस्मृतींची भुतावळ ही असायचीच. तुम्हीही त्याला अपवाद कसे असणार?

मात्र मुद्दा तो नाही. आमची म्हणजे तरुण पिढी राजकारण, लोकशाही, देशकार्य या गोष्टींची allergy बाळगून आहे असे नाही तर जिद्दीनं अवघं आकाश कवेत घेणारी आहे. पण त्याचबरोबर बदल या जगण्यास अत्यावश्यक अशा घटकास आम्हास अपेक्षित अशा वेगाने प्रतिसाद न मिळाल्यानं काहीशी स्वार्थी झाली आहे. स्वत:च्या प्रगतीआड येणारी बहुतेक प्रत्येक गोष्ट नजरेआड करुन आजचा किंवा फारतर उद्याचा पण स्वत:चाच विचार करायची आम्ही सवय लावून घेतली आहे.

मराठीच्या नावानं चांगभलं करून ऐन निवडणूकीच्या मोक्यावर आपला आवाज सर्वांना व्यवस्थित ऐकू गेला. पण जरठ दिग्गजांच्या मांदियाळीत जे तरुणाईचे अंकुर गेल्या दहा वर्षांत देशभरात उगवले त्यात आम्ही तुम्हाला जरूर शोधतो. त्यामुळेच मराठीचा नारा ही निवडणूकीच्या काळाची गरज होती पण आजच्या महाराष्ट्राची गरज त्याहून थोडी अधिक आहे आणि हे आपण जाणता असा विश्वास आम्ही ठेवायचा का तुमच्यावर?

मुंबई, पुणं, नगर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर वगळलं तरी केव्हढातरी महाराष्ट्र शिल्लक राहतो. आपल्या तेरा आमदारांना हा महाराष्ट्र माहित आहे काय? नंदूरबार, बुलढाणा, रावेर, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, गोंदिया इथेही मराठी लोकंच राहतात आणि आणि प्रगतीची आस त्यांनाही असू शकते हे पक्षाच्या नावातच महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची स्वप्नं दाखविणाऱ्या मंडळींनी विसरू नये. आता गोंदियातल्या विडीचा धूर भरल्याशिवाय भारतात एकही विमान उडत नाही. त्यामुळे नाव जरी मागासलेलं वाटलं तरी प्रगतीची वाट कुठल्याही आडवळणापासून सुरु होते हे विसरून नाही चालत.

आणि आहे काय हो या मुंबईत जे करायचं शिल्लक आहे अजून? महाराष्ट्र नव्यानेच निर्मायचा असेल तर मुंबईलाही हेवा वाटेल अशी दोन-तीन शहरं विकसित करून दाखवा ना. मला माहित आहे की हे वाक्य लिहायला जेव्हढं सोपं होतं तेव्हढं कृतीत आणायला नाही. पण सुरुवात कोणीतरी करायलाच हवी, नाही का? आणि हो मुंबईला हेवा वाटेल अशी ठिकाणं तयार करायची म्हणजे गर्दी, traffic, प्रदूषण, महागाई एव्हढेच नव्हे. चार मेगामॉल्स उघडले म्हणून कुठलंही शहर आंतरराष्ट्रीय नकाशात नावारुपाला आल्याचं माझ्यातरी ऐकिवात नाही. त्यासाठी थोडी जास्त मेहनत करावी लागते. आणि त्यासाठी आधी मुंबई, पुण्यापलिकडे नजर जावी लागते. आपलीही ती जाईलच अशी अपेक्षा आम्ही ठेवायची का?

ज्या शिवरायांनी सगळ्या जगाला उत्तम राजशासनाचे धडे दिले त्यात त्यांनी बऱ्याच गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. त्या जर बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आतापर्यंत बहुतेकांनी ज्या भीषण समस्यांचा महाराष्ट्राला भेडसावणारे प्रश्न म्हणूनही स्वीकार केला नाही अशा समस्यांची कदाचित उत्तरेही सापडतील. शेतकरी आत्महत्या करतात हे खरं आहे, पण ते आत्महत्या का करतात हे कोणाला माहित आहे का? आणि जर माहित असेलच तर केवळ त्या थांबविण्याचा प्रयत्न न करता त्यांची प्रगती कशी होईल याचा विचार करायला आजवर कोणाला सवडच मिळाली नाही. तुम्ही काढाल का ही सवड? महाराष्ट्रातही नक्षलवादी आहेत याची चिंता आम्ही रोज लोकलचे धक्के खात ऑफिस वेळेवर गाठायच्या घाईत कधी करायची? पण मुळात एका सामान्य माणसाचा नक्षलवादी होण्यापर्यंतचा प्रवास फळास जाईपर्यंत शासनकर्ते कोणता मलिदा फस्त करण्यात मग्न होते हे त्यांनाच माहित पण कधीतरी तुम्हीही अशा गोष्टी हाताळण्यासाठी पावले उचललीत तर मात्र महाराष्ट्राच्या इतिहासात यादगार ठराल. अशा कामांना glamour नसतंच पण ती केल्याने लोकांचा विश्वास बसतो. निवडणूकांच्या काळात तिकिटाच्या बारिवर हाच विश्वास धमाल उडवून देऊ शकतो.

पुन्हा एकदा मराठी, मराठी माणसांच्या मुद्द्याकडे वळू. तुम्ही एक प्रतिथयश businessman आहात. समजा तुम्हाला एखादा महत्त्वाचा project पूर्णत्त्वास नेऊ शकेल अशा माणसाची गरज असेल तेव्हा तुम्ही non-qualified पण केवळ मराठी म्हणून कोणाची निवड कराल काय? कोणी प्रांतीय मक्तेदारी, शिफारसी चालवू पाहत असेल तर त्यास विरोध जरूर करावा पण प्रत्येक वेळीच आंदोलन करतो म्हणलं तर त्याची किंमत काय हो राहिली? ज्या नोकऱ्यांसाठी आंदोलन करायचं त्यासाठी चर्चेत असणारे मराठी तरुण त्या नोकऱ्यांसाठी लायक आहेत का याचा परखडपणे कोणी विचार करतं का? आणि समजा नसतील तर त्यांच्या उन्नतीसाठी कोणी प्रयत्न करतं का? मुंबईत येणाऱ्या so-called बाहेरच्या लोंढ्यात महाराष्ट्रातील माणसेच जास्त असतात. त्यांनाही परत पाठवायचं का मग? पण मुळात मुंबईत यावं लागतं याचाच अर्थ त्यांना पुरेशा संधी त्यांच्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. ते कधी व्हायचं आणि कोणी करायचं?

राजसाहेब, गेल्या बऱ्याच वर्षांत कोणा राजकारण्याला जे जमलं नाही ते तुम्ही करून दाखविलंत. तुम्ही लोकांच्या मनात तुमच्याविषयी अपेक्षा निर्माण केल्यात! या अपेक्षांच्या ओझ्याची ओळख आपल्याला असेलच पण त्या पूर्ण कशा करणार हे रस्त्यावर उतरूनच्या आंदोलनाशिवाय सांगितलेत तर तुम्हाला पाठिंबा नक्कीच वाढेल.

एक शेवटचं, राहत नाही म्हणून सांगतो. शिवरायांचं साडेतीनशे कोटी खर्चून समुद्रात भव्यदिव्य स्मारक उभारायचं घाटतंय. कोणाची स्वातंत्र्यदेवता पाण्यात उभी म्हणून शिवरायांचं स्मारकही समुद्रात? असल्यांना शिवराय आणि त्यांचा महाराष्ट्र कधी समजलाच नाही. साडेतीनशे कोटी खर्चायचेच असतील तर त्यांत उभा रायगड पुन्हा बांधून निघेल! आहे का तयारी कोणाची? आणि जर नसेल तर जनतेने दिलेल्या करातून गोळा झालेल्या साडेतीनशे कोटींची वासलात जनतेसाठीच लावावी. शिवरायांचा यापेक्षा मोठा गौरव दुसरा कोणता असू शकत नाही.

आपल्याकडून बऱ्याच अपेक्षा बाळगणारा,
एक मराठी माणूस

Saturday, October 3, 2009

बावनकशी

काल पिक्चरला गेलो होतो. Actual पिक्चरबद्दल नंतर बोलू पण सुरुवात कशी झकास झाली त्याबद्दल आधी.

पिक्चरची सुरुवात राष्ट्रगीताने होते हे काही नव्याने सांगायची गरज नाही. पण राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याची सूचना झाली आणि सगळं ध्यान त्या काळ्या पडद्यावर एकवटते न एकवटते तोवर Black&Whiteच्या एका जबरदस्त शेडमध्ये साक्षात लता मंगेशकर पडद्यावर अवतरली. पांढरीशुभ्र साडी, कानात हिऱ्यांच्या कुड्या, गळ्यातल्या सोनेरी चेनवर मध्यात अडकवलेला छोटासा तिरंगा! एखाद्या ध्यानस्थ योगिनीच्या आविर्भावात तिने जन - गण - मन सुरु केले आणि जगातली सर्वात तेजस्वी तलवार सपकन हवेत फिरवल्यावर जशी तेजाची रेखा हवेत दिसावी तसे ते तिचे सूर दिसू लागले. तापल्या मुशीतून शुद्ध सोन्याची धार ओतावी तसे.

साक्षात स्वर्गीय.

पहिली ओळ संपली आणि अस्सल मातीच्या दाणेदार सुरात गीत पुढे सुरु राहिले. आशा भोसले! प्रश्नच नाही.

राष्ट्रगीत पूर्ण म्हणून होईपर्यंत ह्या दोघी बहिणींनी जी करामत केली तिला तोड नाही.

ह्या दोघी गात असताना त्यांना पडद्यावर दाखवा किंवा दाखवू नका, पडद्यावर मधुबाला, माधुरी दिक्षित, वहिदा रेहमान, रेखा, हेमामालिनी अशा सुंदऱ्या असू द्यात किंवा नसू द्यात. ह्या बहिणी जेव्हा गातात तेव्हा त्यांचे सूर नुसते ऐकूच येत नाहित तर दिसतातही!

जय हे! जय हे!

जय जय जय जय हे!

Saturday, September 19, 2009

भिकेचे डोहाळे २

मागच्या पोस्ट्मध्ये जो उल्लेख MUST होता पण मी तो करायचं विसरलो म्हणून हे Addendum.
एका मित्राने एक फक्कड जोक ऐकवला होता.

एयर इंडियाने म्हणे जाहिरात केली की आमच्याबरोबर प्रवास करा म्हणजे तुम्हाला आईच्या मायेची ऊब मिळेल.

प्रवासी म्हणाले की झाडून सगळ्या हवाईसुंदऱ्या आमच्या आईच्या वयाच्या असतात आणि AC बहुतेकदा चालत नसल्याने ऊबही मिळतेच!

भिकेचे डोहाळे!

सरकारच्या हवाई वाहतूक खात्याने फतवा काढलाय, म्हणे सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी एयर इंडियानेच प्रवास करायचा. कारण काय तर याप्रकारे एयर इंडियास वार्षिक दोन हजार कोटींचा महसूल मिळेल आणि दिवाळखोरीच्या दारात उभी असलेली ही सरकारी कंपनी तगेल.

भिकेचे डोहाळे यालाच म्हणतात. एके काळी ही एकच कंपनी भारतीयांना विमान प्रवास घडवायची. गेल्या दहाएक वर्षात चित्र पूर्णपणे बदललं. पण तरीही एयर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी मुजोरी काही कमी झाली नाही. Ground staff तरिही ठीक आहे पण cabin crew ची निवड मात्र नसानसात भिनलेल्या उर्मटपणाची खात्री पटल्याखेरीज करत नसावेत.

अपवाद अर्थातच सगळीकडे असतात. एकदा एका हवाई सुंदरीने माझं हसून स्वागत केल्याचं मला नक्की आठवतं. शिवाय ती सर्व्ह करत असलेली कॉफी गार आहे असं सांगितल्यावर चक्क तिनं ती कॉफी गरम करुन वाढली होती! आणि एकदा एका हवाईसुंदराने In-flight entertainment system काम करत नाही म्हणल्यावर आधी ती थोबडावली आणि तरिही ती काम करीत नाही म्हणल्यावर मागच्या सीटवरची सिस्टिम काम करत आहे हे तपासून मग मला तिथे बसण्याची नम्रपणे विनंती केली. माझ्या हातातला मोबाइल फोन पाहून तो अमक्या एका मॉडेलपेक्षा किती चांगला आहे अशासारखे काही smart प्रश्नही विचारले होते.

अर्थातच हे दोघेही साठीच्या अर्ध्या वयातले दिसत होते. नाहीतर सहसा पन्नाशीच्या आतला चेहरा cabin crew मध्ये कुठनं दिसणार? एयर इंडियाचं दार ओलांडून आत गेलं की काहीवेळा अक्षरश: यमपुरीत entry केल्यासारखं वाटतं. Make-upच्या नावाखाली रंगांचे थर तोंडावर थापलेल्या त्या व्रूद्धा आणि पांढऱ्याशुभ्र केसातून टक्कल दाखवणारे आणि पोट सुटलेले ते जरठ यांचे खडूस चेहरे पाहिले की थोडी भीतीच वाटते.

एकदा take-offच्या आधी मी खूप तहान लागली म्हणून पाणी मागितलं होतं. त्या साठीच्या सुंदरीने ज्या प्रकारे ते आणून माझ्यापुढे आदळलं तेव्हा तिच्या मनातले ’गिळ मेल्या एकदाचं’ हे शब्द मला स्पष्टपणे ऐकू आले होते!

तर असल्या ह्या कंपनीला जीवदान देण्याचा प्रयत्न चाललाय त्याला माझा विरोध नाही पण अनिकेत जे काही मला सांगत होता त्यात logic शोधायचा मी बराच वेळ प्रयत्न केला. तो पुढच्या महिन्यात तेहरानला एका conferenceसाठी जाणार आहे. सरकारी तिकिटाने जायचे असल्याने एयर इंडियाने जाणे ओघाने आलेच. आता गंमत अशी की मुंबई - तेहरान असं इराण एयरचं return तिकिट १९ हजारात मिळतं. एयर इंडियाची तेहरानला direct flight नाही म्हणून मग तो आता मुंबई - दुबई एयर इंडियाने आणि दुबई - तेहरान एमिरेट्स, जे एयर इंडियाचे सहकारी flight आहे त्याने जायचा आहे. Return तिकिटाचा खर्च ३८ हजार फक्त! आणि त्याच्या ऑफिसमधून असे एकूण सहाजण जाणार आहेत.

आता logically विचार केला तर सरकारी म्हणजे पर्यायाने जनतेच्या पाठबळावर चालणारी एखादी कंपनी वाचवताना cost-cutting किती केले? Efficiency किती वाढवली? Quality of service किती सुधारली? ह्या गोष्टींचा विचार करायची गरज आहे असंच मला वाटत होतं!

Saturday, August 22, 2009

नावात काय आहे?


वांद्रे-वरळी पूलाचे घाटत होते तेव्हा मी शाळेत होतो. मी किती वयस्कर झालोय यापेक्षा ही गोष्ट फार फार वर्षांपूर्वीची आहे हे महत्त्वाचं!

तर गोष्ट सुरु झाली आणि सर्वांना मुंबईत उद्या सकाळपर्यंत गोल्डन गेट ब्रिज बांधून तयार होईल अशी स्वप्नं पडू लागली. आता आजतागायत भारत वर्षात असला execution speed कोणी पाहिला आहे का? अर्थातच सम्राट अशोक, मुघल सम्राट किंवा अगदी अलिकडचे शिवाजी महाराज अशांचे सन्माननीय अपवाद वगळता. शिवाजीमहाराजांना अलिकडचे म्हणायचा उद्देश एव्हढाच की आज-काल ज्या वेगाने सरकारी कामे होतात त्याने पुढच्या चारशे वर्षात ती नक्कीच पूर्ण होतील असा विश्वास वाटतो.

तर सी-लिंकची कल्पना कोणा महाभागाने एका अशुभ वेळी मांडली आणि बांधकामातले सगळे अडथळे एकदम निर्माण झाले. माहिमच्या समुद्राची पातळी धोकादायकरित्या वाढेल येथपासून ते माहिमच्या खाडीतील मत्स्यजनांना वाईट वाटेल पर्यंत पुष्कळ वाद झाले. एव्हाना मी कॉलेजात जायला लागलो होतो. त्यामुळे आयत्याच फुटलेल्या शिंगांमुळे बहाल झालेली अक्कल पुरती धुंडाळूनही, सी-लिंक बांधायला लायक मंडळी अख्ख्या भारतात नाहित का असा प्रश्न मला पडायचा.

असो.

न बांधलेल्या पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आणि कधीतरी या पूलाचं काम खरंच सुरु झालं. मी चारशे वर्षांचा count-down केव्हाच सुरु केला होता पण महिन्याभरापूर्वी हा ब्रिज चक्क वाहतुकीसाठी खुला झालासुद्धा!

सोनियाबाई उद्घाटनाला आल्या आणि पवारांनी हलकेच पुडी सोडली, पूलाला नाव राजिव गांधींचं द्यायचं! सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

चोवीस तासही उलटले नव्हते बारसं होऊन तर कोणीतरी डरकाळी फोडली, पुलाचं नाव स्वातंत्र्यवीर सावरकरांवरुनच ठेवायचं! आता झाली का पंचाईत. एका पुलाची दोन नावं कशी ठेवायची? वांद्र्याच्या बाजुला गांधी आणि वरळीकडच्या टोकाला सावरकर म्हणून प्रश्न सोडवता आला असता पण मग पुलाच्या मध्यात आंबेडकर का नकोत? फुले, सरदार पटेल, नेताजी बोस, रविंद्रनाथ टागोर, मदर तेरेसा, झाशीची राणी यांचं काय मग?

सगळ्यात मोठी गंमत म्हणजे, सार्वजनिक ठिकाणांच्या नामकरणावरुन वाद होऊ नयेत म्हणून अशा ठिकाणांच्या नामकरणासच बंदी करणारा कायदा महानगरपालिकेनं कधीचाच केलाय. सगळे कायदे कोळून प्यायलेले आपले मान्यवर नेते हाच तेव्हढा कायदा विसरले होते काय?

Saturday, July 4, 2009

साधर्म्य-वाचक घटना!

नविन गाडी घेतल्यानंतरचा मानसिक प्रवास

पहिला महिना - नविन गाडी drive करायची तेव्हा नव्याची नवलाई तर असतेच पण त्याचबरोबर मनात थोडी धाकधूकही असते. नविन गाडीचं shine जसंच्या तसं राखणं हे म्हणजे परम कर्तव्य. गाडीवर एखादा ओरखडाही उठणं म्हणजे एकदम guilty feeling येतं.

सहावा महिना - ओरखडा वगैरे ठीक आहे, पण शक्यतो मोठा dent नसावा! अगदी वाईट दिसणारे बरेच ओरखडे झाले तर पुढच्या सर्व्हिसिंगला पेंट करून घेता येतं. पण अगदीच dent असला तर मग खरंच वाईट वाटतं. दुसऱ्याची चूक असली तरीही आपल्याला थोडी जास्त काळजी घेता आले असती ही बोचणी मनात राहते.

एका वर्षानंतर - गाडी आहे म्हणजे ओरखडे, dents हे व्हायचंच. पण शक्यतो accidents कसे टाळता येतील हे बघावं. पण ट्रॅफिक किती वाढली आहे आजकाल. बेभरवशाची लोकं कशाही गाड्या हाकणार. मग एखादा येऊन आदळलाच तुमच्यावर तर काय करणार तुम्ही? Damage किती आहे आणि ते कसं manage करता येईल हे पाहणं महत्त्वाचं!

लग्न झाल्यानंतर वेळ पाळतानाचा भावनिक प्रवास

पहिला महिना - आजतागायत ऑफिसमध्ये सहा वाजता फोन करून घरी किती वाजता येणार आहेस असं कोणी विचारला नव्हतं मला. पण कुठेतरी बाहेर जायचं ठरलं होतं. बरं झालं, आठवण करायला बायको आहे आता. वेळ पाळणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं!

सहावा महिना - आता चार कामं एकदम करायची म्हणजे वेळ थोडीफार पुढेमागे व्हायचीच. ऑफिसमधून अगदी बाहेर पडताना एक छोटी मीटिंग ठरली तर काय करणार? होम मिनिस्ट्रीबरोबर बाहेर जायची वेळ ठरली असली तरीही थोडा उशीर सगळ्यांनाच माफ असतो. थोडीफार विशेष सत्कार्यं करून ब्राऊनी पॉईंट्स कमावता येतात. ठरवलेला प्लान थोडा पुढे गेला ही बोचणी राहते मनात पण मग पुढच्या वेळी उशीर कसा होणार नाही याची काळजी घेतली की झालं.

एका वर्षानंतर - आता सगळ्याच गोष्टी काय तुमच्या हातात असतात का? ऑफिसमध्ये उशीर होणं नेहमीच टाळता येईल असं नाही. परवा तर एक शाळेतला मित्र कितीतरी वर्षांनी भेटला वाटेत, मग गेला थोडा बोलण्यात वेळ. पण हो, अगदी crucial events वेळ चुकवून चालत नाहीत. नाहीतर मग जिवावर बेततं. वाढदिवस विसरणं हा तर जिवावर बेतणारा accident! आणि समजा तस काही झालंच तर damage control कसं manage करता येईल हे पाहणं महत्त्वाचं!