Sunday, December 21, 2008

माकडाच्या हातात शॅंपेन

शाहरुख खानला मी माकडापेक्षा अधिक मानत नाही. जेव्हा तो एखादा सणसणीत performance देतो (कभी हा कभी ना, चक दे वगैरे) किंवा एखद्या मुरलेल्या businessman प्रमाणे वागतो (IPL मध्ये त्याच्याच टीमने सर्वात जास्त नफा कमावला होता!) तेव्हा त्याला उत्क्रांतीमध्ये इतर प्रजातींपेक्षा अधिक प्रगती केलेल्या माकडाइतकाच मानतो!

थोडक्यातच सांगायचं तर स्वत:च्या पैश्यांनी मल्टिप्लेक्सचं महागडं तिकिट काढून शाहरुख नावाची तीन तासांची डोएकेदुखी पदरात पाडून घेणाऱ्यातला मी नक्कीच नव्हे. पण माझ्या टीमने मोठ्या उत्साहाने ’रब ने..’चा प्लान बनवला होता त्यामुळे यावेळी बचाव शक्य नव्हता. आणि शेवटी जे व्हायचे ते झालेच. अनुष्का शर्मा नामक कमनीय बांध्याच्या आणि बऱ्यापैकी बोलका चेहरा असणाऱ्या कुडीसमोर म्हातारा शाहरुख त्याच्या ठराविक त्या पाट्या टाकतो आणि ते तीन तास असह्य करतो.

अनुष्का शर्मा, जी आधी खूप impressive वाटते, ती वेष बदललेल्या माकडाला ओळखायला तीन तास घेते, म्हणजे ती काही ’सगळ्या सुंदर मुली मठ्ठ असतात’ ला अपवाद ठरत नाही. मुळात ती नव्या रुपात आलेल्या cheap शाहरुखच्या प्रेमात पडूच कशी शकेल हा प्रश्ण ना तिला पडतो ना दिग्दर्शकाला. आदित्य चोप्राकडून एव्हढ्या पोकळ अपेक्षा ठेवल्या नव्हत्या. पण शाहरुखला assume केल्यामुळे दिलवाले...चा हा दिग्दर्शक साफ fail गेला आहे.

मला इथे काही चित्रपट परिक्षण लिहायचं नाहिये. पण राहून राहून नुकत्याच एका ’आंखो देखा’ love triangle ची आठवण येते आहे. तो देखणा, हुशार, खानदानी, उत्तम sense of humour असणारा. तीही सुंदर, ambitious आणि lively. आणि तिसरा कोन अर्थातच त्या शाहरुख-सामाईकचा. ती आणि शाहरुख एकाच departmentमध्ये होते आणि आपल्या असली heroची entry होण्या आधी किमान एक वर्ष एकमेकाला ओळखत होते. पण आपला hero आणि ती यांचं understanding अगदी बघण्यासारखं होतं. Cross-departmental functioning दोघंही इतक्या smoothly handle करायचे की क्या बात है! आणि शाहरुख केवळ street-smart, qualification - हुशारी यात आपल्या heroच्या पासंगालाही न पुरणारा.

पण त्याची fielding लाजवाब असणार यात शंकाच नाही. गेल्या रविवारी तिचं आणि त्या so-called शाहरुखचं लग्न झालं. ऑफिसमधून आम्ही सगळे गेलो होतो. आपला heroसुद्धा होता, अगदी comfortable.. व्यक्त न केलेल्या भावना सहज लपवून टाकत असावा किंवा बाकीच्यांनाच त्या दोघांच्या होऊ शकणाऱ्या गोष्टीत खूप जास्त interest होता.

काही असो मला मात्र रब ने.. पाहिल्यावर तिची आठवण आली. अमिताभ समोर असताना कोणी शाहरुख prefer करतं का? या मुलींची हीच गोष्ट मला समजत नाही बुवा.

Anyway, गोष्टीतल्या तिघांनाही मी अगदी जवळून ओळखतो त्यामुळे मी तिघांचही चांगलच व्हावं असं म्हणणार पण प्रश्ण मात्र मनात राहिलच, प्रेम खरंच आंधळं असतं की या गाठी वरच बांधलेल्या असतात..

Saturday, November 22, 2008

इंडिया शायनिंग

काल ऑफिसला जाताना गाडी सिग्नलवर थांबली होती. हा सिग्नल भीक मागणारे भिकारी, काहीतरी विकायचा प्रयत्न करणारे भिकारी, तृतीयपंथी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि हो, वाहनांसाठी हिरवा सिग्नल चालू असताना रस्ता क्रॉस करायसाठी धावणाऱ्या माणसांसाठीही अर्थातच!

तर गाडी थांबली आणि पुढचे वीस सेकंद काय कारायचं म्हणून इकडे तिकडे बघायला सुरुवात केली. शेजारीच एक बाईक येऊन थांबली. चालवणारा आपला देसी dude च होता. भर उन्हात काळ्या गॉगलबरोबरच लेदर जॅकेटही घातलं होतं त्यानं. असले प्रकार सहसा हास्यास्पदच असतात.

पण त्याच्या इतक्या सजण्या-सवरण्याचं कारणही त्याच्या मागेच बसलं होतं. कारण एक सुंदर गौरांगना होती. फॉरेन मेड सुंदरी! मी मनात म्हणलं, नशिब आहे साल्याचं, तेव्हा घालेना का लेदर जॅकेट भर उन्हात..

बाईक थांबली म्हणून लगेच त्या दोघांचं कूजन सुरु झालं आणि मधुर प्रसंगात एका तृतीयपंथीयाने एन्ट्री घेतली, अगदी कमला का हमला स्टाईलमध्ये!

पहिली जोरदार टाळी वाजली आणि आजूबाजूच्या किमान पन्नासजणांना ऐकू जाईल अशा आवाजात कमलानं तिला (किंवा त्याला) पैसे दिल्यास देसी dude आणि फिरंगी ललना यांचा संसार कसा सुखाचा होईल, त्यांची मुलं कशी सुखात वाढतील याचा पाढा वाचायला सुरुवात केली. आपला dude कमलाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करत असतानाच विदेशी सुंदरीच्या चेहऱ्यावरील भाव आश्चर्यमिश्रित धक्क्यापासून कुतूहलमिश्रित ’आता करु तरी काय’ पर्यंत तीन सेकंदात बदलले.

पण तिनं वेळ न दवडता आपल्या छोट्याश्या बॅगमधून अगदी छोटासा कॅमेरा काढला आणि पटकन कमलाचे दोन-चार फोटो काढले. कमला जातिवंत अदाकारा त्यामुळे शेवटच्या फोटोला तिनं (म्हणजेच त्यानं) ठेवणीतलं हास्य टाळी मारतानाच्या पोजबरोबर दिलं. विदेशी ललना एकदम खुष!

सिग्नल सुटायची वेळ झाली होती त्यामुळं प्रकरण इथेच संपेल असं वाटतानाच कमलानं पदराखालून मोबाईल काढला आणि मोबाईलवरच्या कॅमेऱ्यावर त्या दोघांचे दोन-तीन फोटो काढले!

आपला dude एकदम चूप. आणि विदेशी पाहुणी आत्ता नक्की काय झालं याचा अदमास लावण्यात गुंतली. एवढ्यात सिग्नल सुटला आणि कमला मोबाईलवर बोलत क्रॉस करून निघून गेली.

बाईक वेगात पुढे जात होती पण विदेशी सुंदरी काही मागे वळून पहायची थांबत नव्हती.

India is shining boss!

Sunday, November 16, 2008

तीन दिवसात दोन पुस्तकं

गेल्या तीन दिवसात मी दोन पुस्तकं वाचून काढली.

गेले काही दिवस (किंवा महिने.. वर्षं म्हणलं तरी चालेल) वाचायला वेळच मिळत नव्हता. वाचायसाठी वेळ न मिळणं हे मला खूप अपमानास्पद वाटतं. वाचायसाठी का वेळ काढावा लागतो? पण रोजचं वर्तमानपत्र वाचणं वेगळं आणि एखाद्या पुस्तकात डुंबणं वेगळं.

खूप दिवस नाही काही वाचलं की आजारी असल्यासारखं वाटायला लागतं. मी काही खूप मोठा रसिक किंवा चोखंदळ वाचक आहे का ते माहित नाही पण वाचकाला काही जात नसते. आणि त्यातही मी हातात पडेल ते वाचतो. केवळ थोर साहित्यिकांचेच सारस्वत लागतं किंवा नवसाहित्याशिवाय तरणोपाय नाही असल्या भानगडी मला सुचत नाहीत. प्रवासात वाचायला अजिबात वेळ मिळणार नाही ही माहित असूनही मी एखादं पुस्तक बरोबर ठेवतो, मग जरा बरं वाटतं.

तर तीन दिवसात दोन पुस्तकं.

दिवाळीमुळे तीन दिवस सलग सुटी होती. त्याआधी संध्याकाळी घरी येताना त्या स्पेशल रद्दीवाल्याच्या दुकानावरून आले. ह्याच्याकडे सगळी पुस्तकं स्वस्तात मिळतात. पायरेटेड प्रिंट्स असोत किंवा कोरी ओरिजिनल, ह्याच्याकडचा रेट सगळ्यात कमी. शिवाय हा वाचून झालेलं पुस्तक पुन्हा विकत घेतो, अर्थातच पैसे आणखी थोडे कमी करून. म्हणून मग One Night at Call Center आणि Five Point Someone उचललं.

ह्या चेतन भगतचा एव्हढा hype झाला आहे की पुस्तक तितकं चांगलं असेल का हा प्रश्ण मनात होताच. घरी आल्यावर हातात पहिल्यांदा Five Point Someone आलं म्हणून तेच वाचायला सुरुवात केली.

हरी, रायन आणि आलोक या तिघांची ही गोष्ट. शिवाय अस्सल उपपात्रंही बरीच. गोष्टीचा plot झकास आहे मात्र चेतन भगतची गोष्ट सांगण्याची पद्धत काही जेव्हढी खरी वाटते तेव्हढीच ती काही वेळेस तद्दन खोटी वाटते, ओढून-ताणून मांड मांडल्यासारखी. म्हणूनच ती अगदी जवळची वाटता वाटता अनोळखी वाटतात. हरी, ज्याच्या तोंडून सगळी कथा सांगितली जाते, तोच इतकं हातचं राखून बोलतो की गोष्टीचा ३६० degree view हवा असेल तर, Five Point Someone, by Ryan आणि Five Point Someone, by Alok वाचावं लागेल. पात्रांची authenticity जर जपता आली नाही तर गोष्टीचं भजं व्हायला कितीसा वेळ लागणार? पुस्तक मस्त आहे पण great वगैरे अजिबात नाही.

One Night at Call Center ही तर एक fantasy. कॉल सेंटरचा डोलारा चेतननं नक्कीच छान उभा केलाय पण त्यातला नायक श्याम - जो ही गोष्ट सांगतो तो अगदी सामान्य असतो. पण नायकाचं सामान्यत्व उभं करताना लेखकाला असामान्य कामगिरी जमली तरच पुस्तक great होतं हे कोणीतरी भगतसाहेबांना सांगायला हवं. त्याने प्रयत्न मनापासून केलेला आहे पण तो प्रयत्न आहे हेसुद्धा जाणवतं. आणि म्हणूनच मला हेही पुस्तक काही खल्लास वाटलं नाही.

पण काही प्रसंग, काही जागा टाळ्या नक्कीच घेतात. अस्सल माणसांची अस्सल दुनिया मोठी अजब असते महाराजा, मग त्यातली साम्यस्थळं दिसली की तोंडातून शिटी येणारच ना!

चेतनचं Three mistakes of my life नाही वाचलं अजून. पण तेही जर याच वळणावर जाणारं असेल तर मात्र त्याला ’व्यक्ती आणि वल्ली’ भेट देईन म्हणतो, home work करायला - माणसं कशी चितारली जातात ह्याचं detailing समजवायला.

दिवाळीचं celebration करून तोंडी लावायला पुस्तकं छानच होती. मुख्य म्हणजे एकेका दिवसात संपणारी. त्यामुळे अख्खं पुस्तक एका दिवसात संपवलं हे समाधान. आता बिल गेट्सचं ’The Road Ahead’ आणून ठेवलंय. But any suggestions?

Saturday, November 15, 2008

बचेंगे तो Monday भी मिलेंगे

"बचेंगे तो और भी लढेंगे" असं कोणीतरी ऐतिहासिक पुरुष म्हणून गेला होता.

किंवा कोणी पुरुषीही म्हणाली असेल. आता स्त्रीला पुरुषी का म्हणत नाहीत हा वादाचा मुद्दा आहे आणि मी वादात पडत नाही. तसं लहानपणी मला, विदुषी हे विदुषकाचे स्त्रीलिंगी रूप आहे असं वाटायचं. असो..

तर मुद्द्याची गोष्ट म्हणजे, बचेंगे तो और भी लढेंगे हे आत्ताच आठवायचं कारण म्हणजे सध्याची जागतिक परिस्थिती!

लेहमन बंधूंनी स्वत:चीच अब्रू स्वत:च्याच हाताने वेशीवर टांगली आणि बॉलीवूडमध्ये Item Songs करायला so called मादक ललनांची रांग लागते तशी मोठमोठ्या अर्थसंस्थांची स्पर्धा सुरु आहे. शेयर बाजाराचा विषय काढला की तर माझ्या काळजात एक स्पष्ट कळ उमटते. उत्साहाच्या भरात लाखाचे बारा हजार नाहीत (माझ्याकडे कुठले लाख रुपये असणार शेयर बाजारात फुकायला) पण बारा हजाराचे बाराशे नक्कीच झाले आहेत. म्हणजे नुकसान जरा जास्तच.

विप्रो, इन्फोसिस वगैरे मंडळींनी निरोपाचे नारळ देताना नारळांची खरेदी घाऊकरित्या केल्याचं ऐकलं आणि आमच्या गोटातही थोडा काळजीचा सूर उमटला. जेमतेम तीनशे साडेतीनशे लोकं असताना आपली कंपनी नारळ खरेदीच्या भानगडीत पडणार नाही असं स्पष्ट मत नीलनं मांडलं होतं. काढायचंच असेल तर त्या निकम्म्या परप्रांतीयाला का काढू नये असंही एका मराठी बांधवाचं मत पडलं. विशालचा मात्र जो तो आपल्या कर्माने येतो आणि जातो यावर गाढ विश्वास! त्याने असं म्हणल्यावर सगळ्यांचीच हवा टाईट. कारण नेमकं कोणतं कर्म यावेळी आडवं येईल याची गॅरंटी नाही.

दबक्या आवाजातल्या चर्चांना तोंड फुटलंय आणि गॉसिप कॉलम भरून वाहतोय. त्यातच एकाला नारळ मिळाल्याची पक्की खबर आहे. उडत्य्या पाखरानं आणखीही काही नावं कानात सांगितली आहेत. तेव्हा शुक्रवारी निरोप घेताना हेच म्हणणं क्रमप्राप्त आहे,

बचेंगे तो Monday भी मिलेंगे!

Monday, September 29, 2008

पाच मिनिटांची अस्वस्थता

डेड्लाईन्स कोणत्याही प्रोजेक्टच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात. आणि मी ज्या प्रोजेक्टबद्दल बोलतोय, तो मी कधीही विसरणार नाही.

त्याला कारणंही बरीच आहेत. प्रोजेक्ट सुरु झाला तेव्हा मला नविन ऑफिस जॉइन करून एक-दीड महिनाच झाला होता. एकूण कामाचं स्वरूप पाहता बरीच मेहनत करावी लागणार होती. ऑफिसमधील सगळी थोर मंडळी बऱ्याच मोठ्या रिझल्ट्सची अपेक्षा ठेवून होती. त्यातून मी नविन म्हणजे ही मंडळी दर थोड्या वेळानी मला मायक्रोस्कोपखाली घालायची. शिवाय ’इन-हाउस’ टीम नाही म्हणून हे काम बाहेरच्या एका कंपनीला आउट-सोर्स केलेलं. आणि त्यातच मोठा झोल झाला.

सुरुवातीचे काही दिवस मोठ्या उत्साहात काम झालं आणि ती ऐतिहासिक माशी शिंकली! ज्या कंपनीला काम आउट-सोर्स केलं होतं ती मंडळी पाट्या टाकताहेत हे एव्हाना लक्षात आलंच होतं, पण कामाचा दर्जा, वेग सगळ्याच बाबतीत त्यांनी असे काही रंग दाखवायला सुरुवात केली की मला घाम फुटला. प्रोजेक्ट मॅनेजर बहुतेक वेळा गायब असायचा, त्याची पोरं काम करायला तयार असायची पण त्यांची अवस्था सेनापती घायाळ झालेल्या सैन्यासारखी होती. एव्हीतेव्ही धावायचंच आहे तर वाट फुटेल तिथे धावायचं असं त्यांचं साधं लॉजिक.

नीलशी वेगवेगळ्या तऱ्हेने बोलायचा मी खूप प्रयत्न केला पण पठ्ठ्या तोंड उघडायला तयार नाही. त्याच्यावर असणारं टेंशन दिसत होतं पण तरीही सारं काही आलबेल आहे असं दाखवायचा त्याचा प्रयत्न होता. शेवटी एक दिवस माझाही कडेलोट झाला. मी त्याला फोन करून मजबूत शिव्या घतल्या. तोही काही मूर्ख नव्हता. मी काय बोलतोय हे त्याला समजत होतं. पण माझ्या आरडाओरड्याचा एकूण कामावर काही फारसा फरक पडला नाही.

मग मी संकल्पला धारेवर धरलं. हा नीलचा बॉस, सिनियर पार्टनर. त्याला केलेल्या काही कॉल्सवर तर मी अगदी ’दिल की भडास’ बाहेर काढली होती.... परिस्थिती फारच हाताबाहेर जायला लागली तेव्हा मी सरळ त्यांच्या टीमबरोबर डायरेक्ट काम करायला सुरुवात केली. येनकेन प्रकारेण प्रोजेक्ट उरकला पण त्यानंतर मी त्यांना एकही काम दिलं नाही. हे काम एप्रिलमध्ये संपलं आणि ही मंडळी ऑगस्टपर्यंत इनव्हॉइस पाठवायलाही विसरली होती. मी माझ्या कलीगला म्हणलंही होतं की केलेल्या कामाचा मोबदला मगणंही ज्यांच्या लक्षात रहात नाही त्यांच्याकडून professionally कोणतीच अपेक्षा करु नये..

मागच्या आठवड्यात शेवटचा इन्व्हॉइस क्लियर केला तेव्हा नीलबरोबर एक छोटी मीटिंग झाली. माझ्या कलीगशी बोलता बोलता तो सहज म्हणला की संकल्पची गाडी आता थोडी रूळावर येत आहे. माझ्या तोंडावरचं प्रश्नचिन्ह त्यानेही वाचलं असावं. मीटिंगनंतर मी माझ्या कलीगला रूळावरच्या गाडीचं रहस्य विचरलं. तो म्हणाला आपला प्रोजेक्ट सुरु झाला त्याच सुमारास संकल्पला मुलगा झाला आणि तो जन्मत:च मूकबधीर होता.. संकल्पसाठी हा अनपेक्षित धक्का त्याला almost depression मध्ये घेऊन गेला. याची परिणिती तो पूर्णपणे कामाबाहेर जाण्यात आणि त्यामुळे कामाची सगळी जबाबदारी त्याच्या नवशिक्या टीमवर येऊन पडली..

खोटं कशाला बोला पण त्या दोघांना त्या bad days मध्ये झापताना कुठेतरी मोठ्ठा तीर मारल्याचं समाधान मिळालं होतं, त्याची जागा एकदम एका विचित्र guilt नं घेतली..

मी इतका वाईट कसा वागू शकतो? काहीतरी चुकतंय हे दिसत असताना मी त्याचं खरं कारण शोधायचं सोडून आपलंच घोडं पुढे दामटत होतो.

माझ्या कलीगला ही गोष्ट माहीत होती. त्याने मला ती का सांगितली नाही मला नाही माहीत.

मी ज्याला कामचुकारपणा समजत होतो त्यामागे काही वेगळी कारणं होती. अर्थातच समजण्यासारखी.
आपण केलेली गोष्ट चूक होती हे सिद्ध झालं की ती guilt माझ्या मनात घर करून राहते. Professionally मी काही मोठी चूक नसेलही केली पण तरीही.. कुठेतरी ते सलत राहतं.

Anyway, मी याला पाच मिनिटांची अस्वस्थता म्हणतो. कारण त्यातून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतरच नसतं.

Monday, August 25, 2008

’क्ष’ची गोष्ट


क्ष एक नंबरचा कामचुकार आहे.


क्षशी पहिल्यांदा भेट झाली तेव्हा तो बऱ्यापैकी ठिकठाक वाटला होता. आम्ही एकाच टीममध्ये काम करणार असं ऐकताना माझाच उत्साह जरा जास्त होता.

मग कामाचं रुटीन सुरु झालं. हळूहळू माणसं, कामं आणि त्या माणसांच्या काम करायच्या पद्धती सगळं काही जवळून पहायला मिळालं. आणि तेव्हाच हा क्ष अगदी अंतर्बाह्य बघायला मिळाला.

दिवसाची सुरुवात केवळ पेपर वाचूनच करावी असं काही नसतं तर ती वेगवेगळ्या न्यूज-साईट्सवर व्हिडीओ पाहूनही करता येते असं त्याला वाटतं.

जीमेल, रेडिफ़्फ़ आणि याहू यांची निर्मिती देवाने दिवसभर माणसाला काहीतरी चालना मिळावी म्हणून केली आहे असं त्याला वाटतं. जरा विचार करून बघा, एकच मेल सर्विस दिवसातून शंभर वेळा चेक करायला किती कंटाळा येईल? पण तीन मेल सर्विस निर्माण करून देवाने विश्वनिर्मितीत कितीतरी वैविध्य आणले आहे.

व्हिडिओ पायरसी करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे असं त्याला वाटतं. आणि त्यासाठी ऑफिसची बॅंडविड्थ वापरणं म्हणजे पुण्यकर्म आहे असंही त्याला वाटतं!

चोरून डाउनलोड केलेले सिनेमे सगळ्यांना वाटणं आणि ऑफिसच्या डीव्हीडीजवर हे सिनेमे बर्न करून घरच्या डीव्हीडी प्लेयरवर पाहणं हेसुद्धा तितकच महत्त्वाचं आहे यात त्याला कोणतीही शंका नाही.

आपला सिनियर आपल्याच काहीच न करण्यानं वैतागतो आहे असं लक्षात आल्यावर काहीतरी थातूरमातूर डिटेल्स सांगून त्याच्या तोंडाला पानं पुसण्यात क्षचा हात कोणीही धरू शकत नाही.

आपण कंपनीत दुसऱ्यांपेक्षा थोडा जास्त वेळ आहोत याचा उपयोग नवीन मंडळींना करून देताना त्यांना साठ टक्के बिनचूक माहिती आणि चाळीस टक्के केवळ चुकीची माहिती देणं त्याला आपण न करत असलेल्या कामापेक्षाही जास्त महत्त्वाचं वाटतं.

देशविदेशात होणाऱ्या विविध परिषदा आणि आपण ज्या क्षेत्रात काम करतो या दोन गोष्टींचा दूरान्वयेही संबंध नसला तरी त्यात उपस्थित राहता यावं म्हणून प्रयत्न करणं हा सेल्फ-इनिशिएटिव्ह्चा भाग आहे असं त्याला वाटतं.

कोण जॉब बदलणार आहे, कोणाला किती पगारवाढ मिळाली, कोण कोणत्या राजकारणात किती सक्रीय आहे, पाय खेचण्याच्या शर्यतीत ’अ’ने ’ब’ला नक्की काय केले तर ’ब ’चा पुरता बीमोड होईल, ’क’ला हैराण करण्याचे पंच्याऎशी प्रकार...असल्या कोणत्याही प्रकारची माहिती मिळविण्याचे एकच ठिकाण, क्ष!
फारसं काहीच न करता प्रचंड व्यस्त असल्याचा आव आणता येतो तुम्हाला? ’क्ष’ला जाऊन भेटा.

इतके सदगुण एकाच ठिकाणी साचलेली व्यक्ती या कलियुगात मिळणं तर कठीणच आहे.

मीच काय तो पामर, इतक्या दिवसात फारसं काही शिकू शकलो नाही.

आणि हो, चार दिवसांचं काम सहा महिन्यात पूर्ण न करून आपल्यावर असलेल्या कामाच्या ओझ्याची सांगोपांग चर्चा तुम्हाला करता येते? आता मात्र ’क्ष’शिवाय तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही.

Sunday, June 15, 2008

जाने कहा गये वो दिन...

पोस्टला अशी फिल्मी नावं दिली की वाचणाऱ्यांच्या अपेक्षा एकदम वाढतात. पोस्ट क्लासिक असण्याची शक्यता शून्य असली तरी निदान ते एखाद्या ’क्लासिक’वर असेल अशी आशा असते. ही आशाही फोल ठरेल हे मी आधीच सांगतो. नंतर मग वाचकांच्या पत्रांची (कमेंट्सची!) मारामारी नको. खरंतर वीकेंड संपत आला आहे आणि दोन दिवस पूर्ण वाया घालवल्यावर जे एक चमत्कारिक नैराश्य येतं त्यामुळे असेल.. किंवा शून्यातून नाविन्य निर्माण करणारे न्यूज चॅनेल्स जरा जास्त बघितल्यामुळेही असेल.. पण हे पोस्ट लिहिणं हा वेळेचा निव्वळ अपव्यय आहे. आणि तुम्ही अजूनही वाचत असाल तर तुमच्या हिंमतीची दाद देतो आणि तुमचा वेळही नक्की वाया जाईल याचीही खात्री देतो!

तर आज सकाळी मी नेहमीप्रमाणे उशीरा उठलो. आता रविवारी सकाळी जाग आल्यावर किमान अर्धा तास तरी बिछान्यात लोळत पडणे क्रमप्राप्त असते. आणि नेमकी याच वेळेस ’recent times’मध्ये केलेल्या पापांची उजळणी मनातल्या मनात सुरु होते. गेले दोन-तीन महिने मी नक्की काय-काय केलं हे आठवतही नाहिये. म्हणजे सकाळी उठलो, दात घासले, आंघोळ केली वगैरे वगैरे झालंच. पण वर्षाच्या सुरुवातीला चुकून एक यादी बनवली होती, ती आठवली आणि स्वत:चाच राग आला. अर्थातच त्या यादीतल्या अनेक गोष्टींचा पत्ता नाहिये आणि त्याला बऱ्याच अंशी माझा बॉस जबाबदार आहे.

आता यात बॉसचा काय संबंध असला illogical प्रश्न विचारू नका. कारण उद्या तुर्कस्थानात एखाद्या अमेरिकन प्रवाशाला बनावट चायनीज वस्तू विकताना बिहारी भैय्या गजाआड गेला तर त्या घटनेशीही बॉसचा संबंध लावता येऊ शकतो! मग माझे गेले दोन-तीन महिने, तेराव्या शतकात आफ्रिकेतून विकत घेतलेल्या गुलामांची डचांनी पिळवणूक करावी, तशी अवस्था करणारा माझा बॉस... जरा अति होतंय..

पण आईशप्पथ, ह्या काळात असे काही अनुभव घेतले की मझा आ गया! वाटलं आयुष्य आयुष्य म्हणतात ते हेच. पराकोटीचा गोंधळ, उच्च्वर्गियांच्या (upper management) अपेक्षा, कामचुकार सहकारी, कामं उरकताना होणारी दमछाक, औत्सौर्चे केलेलं काम पूर्ण करून घेताना ’ही मंडळी वन टू का फोर’ का करतात असे पडणारे प्रश्न, न मागता मिळालेले आणि तितकेच बिन-उपयोगी सल्ले... यादी न संपणारी आहे. पण याबरोबरच न चुकलेल्या डेड्लाईनचा आनंद, ऐनवेळी सहकारी-मित्राने केलेली मदत, वरवर खडूस भासणऱ्या डिपार्टामेंट हेडने आपणहून दिलेली मी केलेल्या कामाची पावती, काही नविन मित्र (की ज्यांच्यामुळे काम करताना तर मजा येतेच पण शीण आणणाऱ्या मंडळींचा त्रासही सुसह्य होतो!) यामुळे इथे आठ महिने कसे गेले कळलेही नाही. सध्या मी फक्त एव्हढंच म्हणतो आहे की,

Probation संपले, Confirmation जाहले।
Appraisal कधी होणार, देव जाणे॥

नव्या नोकरीत जीवतोड मेहनत करून बऱ्यापैकी काळ लोटला की केलेल्या कामाचे appreciation कसे होईल (किंवा होणार की नाही), future growth कशी मिळेल असे प्रश्न पडतातच. I hope you understand what I mean.

मग या सगळ्यातून जाताना ब्लॉगकडे बघायला वेळच मिळाला नाही. तसा मी काही नियमितपणे डायरी लिहिणाऱ्यातला नाही. डायरी लिहिणं मला कायमच थोडं formal वाटायचं. कोणाला शिव्या घालायच्या असतील किंवा मनातली मळमळ बाहेर काढायची असेल, तर ते हाताने लिहून काढणं हे आणखी एक पाप केल्यासारखं. पण computer वर सगळी पापं माफ. शिवाय पोट साफ झाल्यावर मन कसं फुलपाखरासारखं हलकं होतं तसंच feeling येतं.

काही गोष्टींवर खरंच लिहायचं आहे तर काही पोस्ट्स अर्धवट लिहून पडले आहेत. शिवाय बॉसकडून गुलामांची पिळवणूक हा साथीचा रोग जगभर पसरला असावा कारण मी ज्यांचे ब्लॉग्स नेहमी वाचतो त्यांनीही बरेच दिवसात काहीच लिहिलेलं दिसत नाही. सगळ्यांनाच आणि एकाच वेळी नवसाहित्यनिर्मितीचा उबग येणं शक्य नाही. म्हणजे पुन्हा, ’तेराव्या शतकात आफ्रिकेतून विकत घेतलेल्या गुलामांप्रमाणे.....’. आणि असं जर काही नसेल, तर मंडळी पुढचं पोस्ट कधी टाकताय?

Saturday, March 29, 2008

आणखी एक यादी

नविन वर्ष सुरु होताना नविन resolutions करणं मला फारसं मानवत नाही. पण गेल्या वर्षीचा डिसेंबर काही अशा घटनांचा होता की मी खरंच विचारात पडलो.

गेली काही वर्षे, आला दिवस साजरा करण्यातच मी इतका बिझी झालोय... म्हणजे जॉब एकदम मजेत चाललाय. (जेव्हा तो कंटाळवाणा होतोय असं वाटलं तेव्हा तो बदललाही होता.) काम interesting आहे. शिवाय ते भरपूरही आहे. सोमवार उजाडला की शुक्रवार कुठे संपतो ते कळतही नाही. रोज सकाळी उठायचं, जमेल तेव्हा जिमला हात लावून यायचा, ऑफिसला पळायचं. मग दिवसभर कधी मजेत तर कधी एकदम धावपळीत काम एक्के काम. बॅकग्राउंडला गाणी-गप्पा चालू असतात, पण ते तेव्हढ्यापुरतच. संध्याकाळी घरी आलं की थोडावेळ टीव्ही, जेवण, कधी काही वाचलं तर नाहीतर एकदम झोप.
हे काय life आहे?

म्हणजे करियरचे प्लानिंग वगैरे चालुच असतं. त्यापासून कधी सुटका नसतेच.

दोन वर्षांपूर्वी गिटार शिकायला सुरुवात केली होती. नक्की कधी बंद पडली, आठवतच नाहिये. शेवटचं पुस्तक बहुतेक The monk Who Sold his Ferrari. ते पण अर्ध्यातच सोडलं होतं. बरंच फिल्मी वाटलं होतं. पुस्तक हातात पडल्यावर ते अधाश्यासारखं संपवण्यातही एक मजाच असते. पण आपण काय करू शकतो यापेक्षा आणखी काय काय करता येईल ही गोष्ट मला जास्त exciting वाटते.

म्हणजे असं नाही की, एक ना धड भाराभर चिंध्या.

पण I like to push myself to limits.

आणि यासाठी मी काहीही करत नाहिये हे डिसेंबरमध्ये लक्षात आलं.

दिवस भुर्रकन उडून जातात आणि मग हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, असं स्वत:लाच torture करणं सुरु होतं. मग त्यापेक्षा आळस झटकून काहीतरी productive का करू नये असा किडा डोक्यात वळवळला आणि खरी मजा सुरु झाली. थोडक्यात काय काय करायचं आहे याची यादी बरीच मोठी आहे.

पण काही गोष्टी या वर्षात करायच्याच असं ठरवलंय. त्यातल्या काही गोष्टी अशा..

गिटारवरची धूळ पुन्हा एकदा झटकायची.

एखादी नविन भाषा शिकायची.

कुठेतरी फिरायला जायचं. नवा गाव किंवा नविन देश! (हे जरा जास्त होतंय आता)

टेक्नॉलॉजीमध्येच बरंच काही वाचायचंय.

नियमितपणे काहीतरी लिहायचं.

गाणंही शिकायचंय. (पण प्रत्येक वेळी मी माझाच आवाज ऐकून हा विचार सोडून देतो!)

मग रेडिओ जॉकी बनणं जरा फारच झालं, पण निदान नॅशनल जिऑग्राफिकच्या एखाद्या फिल्मसाठी व्हॉइस-ओव्हर वगैरे.
एखाद्या NGO साठी काम करायचं. जे वाटतं त्यात आपण प्रत्यक्ष जोपर्यंत करत नाही तोपर्यंत त्या नुसत्या वाटण्याला काय अर्थ आहे? मग भले NGO नाही सापडला तरी एखादं पाऊल टाकायचं.

आणखी बरंच काही.. लिहिलंय त्यातल्या अर्ध्या गोष्टी जरी झाल्या तरी मग आणखी एक यादी बनवायला हरकत नाही.

Sunday, March 23, 2008

एका लग्नाची गोष्ट

धनेशचं, माझ्या मोठ्या भावाचं लग्न होऊन आता चार वर्षं झाली. म्हणजे ’लग्न’ या विषयावरून माझा छळ सुरु झाल्यालाही आता चार वर्षं झाली! मला अगदी स्पष्ट आठवतंय, मी रिसेप्शनच्या हॉलच्या गेटवर सर्वांना रिसिव्ह करायला उभा होतो. आई-बाबा गर्दीत कुठेतरी गायब झाले होते. धनेश स्टेजवर उभा होता. सगळे काका/मामा/आत्या/मावश्या मला सपोर्ट म्हणून माझ्याबरोबर उभे होते पण सव्वातीन मिनिटांच्या वर एका जागी टिकत नव्हते. ओळखीच्या झाडून सर्वांना बोलावल्याचा हा परिणाम.

मग माझा बाजीप्रभू देशपांडे! कारण लोकांना रिसिव्ह करणं सोपं होतं पण एका (भोचक) काका-काकूंनी माझं स्वागत स्वीकारत आजूबाजूच्या वीस जणांना ऐकू जाईल अशा आवाजात विचारलं, "आता धनेशचं झालं, तुझं केव्हा?" एक तर ओळखीच्या आणि बिना-ओळखीच्या लोकांचं बत्तिशी दाखवत स्वागत करा आणि वर हे असले प्रश्न.

शिवाय असले प्रश्न मोठे अडचणीत पाडणारे असतात. हो म्हणावं तरी झोल (’गुडघ्याला बाशिंग’ वाला प्रकार) आणि नाही म्हणावं तरी ’काय मूर्ख आहे हा, आता सगळ्यांची लग्नं होतातच, मग मुलं होतातच...’ असल्या नजरांना सामोरं जावं लागतं. तेव्हा मी नुसतं हसून वेळ मारून नेली होती. पण ’आता तुझं केव्हा?’ (लग्न हो!) हा प्रश्न मला चिकटला तो चिकटला. मग काही दिवस ’भारतात बालविवाह करायला बंदी आहे’ वगैरे उत्तरंही देऊन झाली. पण आता बहुतेक डोक्यावर अक्षता पडेपर्यंत त्यापासून सुटका नाही.

मी काही लग्न करण्याच्या विरोधात नाही, पण काहीवेळा इतरच माझ्या लग्नाची घाई झाल्यासारखे वागतात. सोनालीच्या लग्नाला गेलो होतो तेव्हा जमलेल्या मित्रमंडळींपैकी एखाद-दुसरा (म्हणजे मीसुद्धा त्यातच!) सन्माननीय अपवाद वगळता बाकी सगळे मित्र सपत्निक किंवा मैत्रिणी सपती आल्या होत्या. मग चेतन म्हणाला पण, ’ आम्ही सगळे जोडीने आलोय आणि तू एकटा. किती अवघडल्यासारखं वाटतय ना?’ आता घ्या.. अवघडल्यासारखं वाटायला पाहिजे मला आणि मी मात्र मजेत म्हणून हे लोकं मलाच शिव्या घालताहेत. इतने साल की गेहरी (वगैरे) दोस्ती आणि लग्न होताच सगळ्यांची पार्टी चेंज!

माझ्या मावशीने आणि तिच्या अमेरिकेत राहणाऱ्या मुलीने (ही म्हणजे एकदम अधिकार वगैरे गाजवणारी माझी ताई) तर मला स्वतंत्रपणे गंभीर धमकी दिली आहे. गंमतीची गोष्ट अशी की दोन्ही धमक्यांमधील Terms and Conditions सारख्याच आहेत आणि त्या म्हणजे, माझं लग्न ठरल्याचं मी आधी तिलाच सांगायचं (Applicable to both!) आणि माझ्या होणाऱ्या बायकोला तीच आधी भेटणार! (Again applicable to both!!) म्हणजे मधल्या मधे माझाच बळी जाणार.

सगळ्यात कहर झाला गेल्या आठवड्यात. माझा एक मित्र आहे. आता त्याला आपण ’क्ष’ म्हणू. तर या ’क्ष’चं लग्न होऊन झाले असतील सहा महिने. लग्न झाल्यापासून अगदी सभ्यतेचा पुतळाच झालाय जणू. अधून-मधून आम्ही त्याला त्याच्या ’मर्द बन’च्या दिवसांची आठवण करून देतो पण शेवटी होम मिनिस्ट्रीपुढे काय करणार बिचारा. तर त्याने मला फोन केला. बऱ्याच दिवसांनी बोलणं होत असल्याने रिवाजानुसार मी ’भ’कारांत विशेषणांनी त्याची विचारपूस केली. नेहमीचे रीति-रिवाज उरकल्यावर म्हणाला, ’बायको मागे लागली आहे, की तुझा मित्र लग्नाचं पाहतो आहे का ते विचार म्हणून.’ पुन्हा एकदा विशेष विशेषणांची उकळी आली, त्याला म्हणालो, ’गधड्या, आपल्यात तुझं लग्न आधी झालं तर बिनलग्नाचे इतर चारजण आत्महत्या करणार होते. आता तुझे दोनाचे चार झाले म्हणून हा तोरा का?’

त्यावर म्हणाला, ’अरे बाबा, ’क्षा(म्हणजे त्याची बायको)’ची एक खास मैत्रीणपण लग्नाची आहे म्हणून ही चौकशी..’ तरीच म्हणलं, हा एव्हढा समाजोपयोगी कामं कधीपासून करायला लागला.

बरं ही चौकशी तेव्हढ्यातच थांबेल असं वाटलं होतं. पण दोन दिवसांनी ’क्षा’चा फोन! पुढे काय आणि कसं करायचं म्हणून विचारायला. तीपण म्हणालीच की तुझा मित्र किती कामाचा आहे ते माहित आहे म्हणून मीच फोन केला. आता ’क्ष’ला असले अनेक गुन्हे मी माफ केले आहेत. पण मुद्दा तो नाही. लग्न झालेल्यांना बिनलग्नाच्यांचं सुख बघवत नाही का माहित नाही. पण मुद्दा तोही नाही. अशावेळी नक्की काय करावं याचं अधिकृत प्रशिक्षण मी घेतलेलं नाही. कुछ करना पडेगा..

आजूबाजूच्या वातावरणात हे अचानक झालेले बदल दखलपात्र आहेत हे नक्की. तेव्हा आता आमची विकेटही लवकर पडणार काय असं वाटायची वेळ आली आहे. Howz that?

Sunday, March 16, 2008

बासरी आणि संतूर

आज सकाळी दहा मिनिटे डोळे मिटून शांत बसलो होतो. आजकाल काहीसुद्धा न करता डोळे मिटून शांत बसणं हे केवळ झोप या प्रकारातच मोडतं. पण रविवारची सकाळ आणि त्यामुळे वाटेल तेव्हा बिछान्याचा निरोप घेण्याची मुभा असल्याने, सहजी लोळताना कालची संध्याकाळ आठवली.

दहा-बारा दिवसांपूर्वी ’सिलसिला - सुरों का’ ही पेपरमध्ये आलेली जाहिरात पाहूनच ’हा कार्यक्रम चुकवायचा नाही!’ असं ठरवलं होतं. हरीप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार शर्मा यांच्या बासरी आणि संतूरच्या जुगलबंदीचा कार्यक्रम. आजवर हरीप्रसादांची बासरी आणि शिवकुमरांचा संतूर पुष्कळ वेळा ऐकला होता. अगदी त्यांची जुगलबंदीसुद्धा. पण केवळ कॅसेट, सीडी किंवा टीव्हीवर. प्रत्यक्षात कधीच नाही.

खरंतर किती वेगळ्या जातीची ही वाद्यं. संतूर म्हणजे मधुर सुरांचा दाणा न दाणा स्पष्ट ऐकू येणार आणि किंचित घोगऱ्या आवाजाची बासरी काळजाचा ठाव घेणार. अर्थात सूर पेलणारा वादकही तेव्हढ्याच तयारीचा हवा. पण शिव-हरी ही जोडी असताना कार्यक्रम एकदम ’वसूल’ होणार याचीही खात्री होतीच. कार्यक्रमही तसा बऱ्यापैकी वेळेत सुरु झाला. प्रथम चरण केवळ संतूरचा! शिवकुमार शर्मांचे व्यक्तिमत्त्वच इतके प्रसन्न आहे की मांडीवर संतूर तोलत ऐटीत बसलेली त्यांची मूर्ती पाहूनच आपण खुश! मग अगदी शालीन, नम्र आवाजात त्यांची प्रस्तावना. कोणता राग सादर करणार आहोत, त्याची उलगड कशी होईल, पखवाजाची साथ नक्की कुठून सुरु होईल याची माहिती. शिवाय आम्ही संथ लयीत सुरुवात करतो आणि काय करता येईल याचा अंदाज बांधत लय, द्रुत लय पकडत नजाकती पेश करतो हेसुद्धा सांगितले. (ही सूचना विशेषत:, कार्यक्रम मुंबईत होता म्हणून असावी!)

आणि मग सुरु झाली संतूरच्या सुरांची कशिदाकारी. काश्मिरच्या खोऱ्यातल्या या वाद्याच्या सुरावटी अगदी तलम रेशमी वस्त्रावर त्याहून अधिक तलम कशिदाकारी उमटत जावी तशाच उलगडत गेल्या. पखवाजाची साथ भवानीशंकरांची. संतूरच्या सूरांनी टाळ्या घेतल्या नसत्या तरच नवल.

लाजवाब कारागिरी!

मग द्वितीय चरण बासरीचा. एकदम टिपिकल भैया पिवळ्या रंगाचा झब्बा घातलेले हरिप्रसाद चौरसिया पाहून मनात पहिली प्रतिक्रिया उमटते ती म्हणजे, ’किती साधा आहे हा माणूस!’. आणि सुरुवातही तशीच. काहीही निवेदन नाही, काही नाही. निवेदिकेनंच ते कोणता राग सादर करणार आहेत याची माहिती दिलेली. विशेष म्हणजे, हरिप्रसादांची कला ही त्यांनी स्वकर्त्ऱुत्त्वावर विकसित केलेली. बासरी ही काही त्यांची पिढीजात संपत्ती नव्हे. मला हे माहित नव्हतं. सुरांचा उत्तुंग इमला त्यांनी स्वबळावर बांधला तर. अशी लोकं मला जरा जास्तच इंप्रेस करतात!

काहीही न बोलता त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीच्या काही घोगऱ्या सुरांनंतर त्यांनी चक्क एक कॅनव्हास रंगवायला घेतला. दऱ्या-खोरं, नजर पोहोचेल तिथवर दिसणारी हिरवीकंच कुरणं, विस्तीर्ण जलाशय आणि बहारदार अरण्यं. सगळं काही स्पष्ट उभं झालं त्या सुरांतून. तबल्याची साथ विजय घाटे यांची. एकदम flawless performance. या दोघांनी एक छोटीशी जुगलबंदी रंगवली ती तर त्या कॅनव्हासवर सगळ्या रंगांची अचूक उधळण करून गेली! इथवरचा कार्यक्रमच पूर्ण वसूल होता. इथून पुढे फक्त बोनस.

अंतिम चरण जुगलबंदीचा. कार्यक्रम बासरी आणि संतूरचा असला तरी पखवाज आणि तबला वाजवणारेही दिग्गजच. थोडक्यात काय तर चौघेही ’पंडित’ बिरुदावली मिरवणारे! शिवकुमारांनी, त्यांच्या हरिप्रसादांबरोबरच्या असणाऱ्या, जुगलबंदी किंवा स्वरांपलीकडे गेलेल्या मैत्रीविषयी सांगत सुरुवात केली. त्यावर हरिप्रसाद म्हणाले, ’अशीच मैत्री तबला आणि पखवाज यातही आज दिसावी अशी मी आशा करतो कारण वाजवणारे दोघेही महारथी आहेत, त्यामुळे कोणी कोणाचे ऐकावे असा प्रश्न न येवो!’ कमी बोलणारी माणसं शालजोडीतला हाणतात ती अशी!

आतापर्यंत केवळ तलम कशिदाकारी असणारं रेशमी वस्त्र, बेहद लाजवाब निसर्गसौंदर्यच पाहिलं होतं. पण जुगलबंदी सुरु झाली आणि जे काही अनुभवलं ते अवर्णनीय होतं. थोडक्यातच सांगायचं झालं तर ते तलम कशिदाकारीचं वस्त्र ल्यायलेली कोणी सुंदरा त्या अफाट अरण्यात त्या जलाशयाच्या काठानं बेभान धावत होती!

Simply marvelous...

Saturday, January 5, 2008

प्लालकट़्टी पट़्टानी मसाला

वर जे काही लिहिलय ते मेन्यु कार्डमध्ये वाचलं आणि म्हणलं हीच ती डिश.

बाकीच्या चौघे अगदी ’घनिष्ठ’ मैत्र असले तरी त्यांच्यात मीच काय तो शुद्ध शाकाहारी. त्यामुळे या आंध्रा-केरळा मेन्युच्या हॉटेलात ते स्टार्टर्सही नॉनवेजच ऑर्डर करणार हे ओघाने आलेच. मग त्यांची कोंबडी आणि माश्यांची ऑर्डर देऊन झाली तरी वेटर आपला माझ्यापुढे उभाच. मी मनातल्या मनात ’दहा-वीस-तीस’ करून ही एकदम एक्झॉटिक नाव असणारी डिश निवडली.

डिशचे वर्णन तर सहीच होते. पनीर काय, कसले कसले मसाले काय, मग त्याचं अजून काय काय करतात वगैरे वगैरे. भरीस भर म्हणून बाकी सगळ्यांच्या ऑर्डर्स आल्या तरी अस्मादिकांच्या ’प्लालकट़्टी पट़्टानी मसाला’चा पत्ता नव्हता. मग सगळ्यांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आणि वेटर मटार-पनीर घेऊन आला!

टोटल पोपट.

आता मटार-पनीरला आंध्रात हे असले काहीतरी भयंकर नाव आहे हे मला काय माहित. बरं जर मटार आणि पनीर जर त्यातले मुख्य घटक असले तरी त्याचं काहीतरी वेगळं नाही का करायचं? चांगला डायरेक्टर मिळाला की शाहरुख खान पण क..क..किरण करीत नाही. मग नाव मारे मोठे असले तरी या हॉटेलातला कूक अगदीच बेचव असावा. आईकडे ट्रेनिंगसाठी पाठवला पाहिजे त्याला. नावडत्या भाज्या एक्झॉटिक करून आमच्या गळी कशा उतरवायच्या यात तिचा हात धरणारे कोणी नाही.

असो.

तर नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा म्हणतात ते काही अगदीच खोटे नाही.

पुढच्या वेळी असल्या नविन ठिकाणी गेल्यावर ’दहा-वीस-तीस’ पेक्षा टॉस केलेला बरा का ’अडम-तडम तडतडबाजा’ जास्त इफ़ेक्टिव रिझल्ट देईल याचाच विचार करतो आहे सध्या.

Tuesday, January 1, 2008

२००८

पुन्हा एक नवे वर्ष

पुन्हा काही नवी स्वप्नं

तीच ती आकाशाला गवसणी घालण्याची इच्छा

And the same old me!