Monday, June 11, 2007

मुंबईचा पाऊस...


आजकाल रोज सकाळी मी न चुकता इंटरनेटवर मराठी "वर्तमानपत्र" वाचतो. पेपरला वर्तमानपत्र म्हणले की अगदी त्या छापील कागदाचा वास नाकात गेल्यासारखे वाटते. विशेषत: मे महिना संपत आला की एखादे दिवशी हा सकाळी येणारा पेपर किंचित भिजून येतो. कारण पाऊस सुरु झालेला असतो ना! चार दिवसांपूर्वी इंटरनेटवरील पेपरमध्ये "नभ मेघांनी आक्रमिलेल्या" मुंबापुरीचा फोटो पाहिला आणि क्षणभर थेट तोच ओला सुवास मजभवती दरवळला.

मे संपत आला की मुंबईकराचा चातक होतो. बेसुमार गरमी, दमट हवा आणि घामाच्या धारा! किती म्हणून सहन करायचे? मग तापमान किती वर चढले यापेक्षा ते खाली कधी जाईल याचे आडाखे इयत्ता दुसरीतले विद्वान ते प्रोफेशनल भविष्यकार कोणीही मांडू शकतात. जीवाची काहिली होणे याचा अनुभव शब्दश: येतो आणि अशातच एके दिवशी तो येतो. आगाऊ सूचना देणे त्याच्या शब्दकोषात नसावेच. पर्जन्यराजा ना तो! मग अवेळीच तो बरसतो. कोणाचीही फिकीर न बाळगता. सदैव कामाच्या धावपळीत असणारे चाकरमाने, संपत आलेल्या सुटीची मजा लुटणारी पोरेटोरे, न थकता धावणाऱ्या गाड्या-टॅक्सी-बस-ट्रेन्स सगळ्यांना दखल घ्यावीच लागते या पावसाची. न घेऊन जातील कुठे कारण सालाबादप्रमाणे गेल्या वर्षीही या सगळ्यांनी एकदातरी या पावसाचा दणका अनुभवलेला असतो.

मला अगदी स्पष्ट आठवते, आमच्या शाळेला इतर असंख्य सुट्यांमध्ये पावसाची सुटीदेखील मिळायची. आम्हाला शाळा अगदी घराजवळ. भिजत-भिजत शाळेपर्यंत पोहोचले की कळायचे की सुटी जाहीर झाली आहे. मग धम्माल! उरलेला दिवस पावसात उंडारणे हाच काय तो उद्योग. म्हणजे मुंबईभर पावसाने थैमान घातलेले, आम्हा ’निरागस’ बालकांच्या जीवाला अपाय होऊ नये म्हणून शाळेने सुटी दिलेली आणि आम्ही आपले तोंड वर करुन भिजत फिरतोय सगळीकडे! सगळाच आनंदीआनंद.

एरवीची काळवंडलेली मुंबई चार सरी पडून गेल्या की कशी लख्ख होते. प्रत्येक ओल्या श्वासात एक ताजेपणा येतो. शिवाय दरवर्षी एकदातरी पावसाने मुंबई बंद पडण्याचा कार्यक्रम ठरलेला असतो. तुफानी पाऊस सगळ्यांची दैना उडवत असला तरी मला तो आवडतो. गर्जून धुंवाधार बरसणारा पाऊस कुठेतरी माझ्या अंतर्यामी ओळखीची खूण पटवून देतो आणि जीव सुखावतो. निसर्गाच्या या विराट रूपाचे आणि माझे काही जवळचे नाते असावे. म्हैसूरच्या कृष्णराजसागराचा अथांग जलाशय सायंकालच्या संधिप्रकाशात पाहताना किंवा हरिहरेश्वरच्या प्रदक्षिणा मार्गावरील खवळलेला समुद्र पाहताना माझे अस्तित्त्व माझ्याही पलिकडे असल्याचे प्रकर्षाने जाणवले होते.

तर मुंबई आता पावसात ओलिचिंब होईल आणि मी या वाळवंटात तो पाऊस मनोमन झेलण्याचा प्रयत्न करेन. ’प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ असे म्हणतात. इथल्या अरबांनी हा उपाय गेली शेकडो वर्षे प्रत्यक्ष वापरला असावा. तेल स्वस्त आणि पाणी महाग! मग निळ्याकाळ्या आकाशाकडे पाहता पाहता पाऊस पिणे, भिजल्या मातीचा गंध लुटणे, ओल्या हातांवर नवे तुषार झेलणे आणि गळणाऱ्या प्रत्येक जलबिंदूत सृष्टीची असंख्य प्रतिबिंबे पाहणे यंदातरी शक्य वाटत नाही.

ह्म्म्म!

रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मनभिगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन
काही गाणी अगदी ’सिम्युलेशन टूल’ सारखी वापरता यावीत. पाऊस पडतोय, ते दोघे पूर्ण भिजले आहेत तरी हातात हात घालून भर रस्त्यात फिरत आहेत, सगळ्यांच्या मध्यात असूनही वेगळ्या विश्वात! बॉलीवूडची एक पावसाळी फॅंटसी. एकदा मलाही घ्यायचा आहे हा अनुभव. (म्हणजेच मी अजून ’एलिगिबल बॅचलर’ आहे हे सूज्ञास सांगणे न लगे!)

किंवा, लगी आज सावन की फिर वो झडी है, वही आग सीने में फिर जल पडी है...

किंवा, बरखा भेरी गयो सजनवा, जाने न दे मोहे..... ’किशोरी’स्वरातील ही मल्हारी-साद केवळ एकमेवाद्वितीय!

माझी खात्री आहे, ज्या दिवशी मला असे गाता येईल त्या दिवशी नक्की पाऊस पडेल.

मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी!

6 comments:

Tulip said...

Mumbaichya pavasachya athavanine kas chhan vatal!
post avadal.
btw tujha te haataat haat ghevun pavasaat firanyach swapn essel world chya monsoon ads chi athavan devun gel:)).
pavus jhalay ki nahi suru ajun mumbait?

Yogesh said...

punyat pan pawasachi vaat pahoon kantalalo ahe.
saala ghaam ne ghaam ne ghaam saala.

Raj said...

पावसाच्या आठवणी आवडल्या.

rayshma said...

are u in b'bay or dubai? does it rain in dubai? rains were the one thing i missed d most while in muscat. i think to make up for that, we had a flooded b'bay the year i got back! :D
m blog-rolling u.

A woman from India said...

Nice post.
I will write more about Amtes.

a Sane man said...

Nice post...Rains is something that simply continues to make me more and more homesick...