Monday, September 24, 2007

गणपती चालले गावाला...

आमच्याकडे गौरी-गणपती असतात.

म्हणजे कधी पाच दिवस तर कधी सहा दिवस. मला आठवतं, एकदा गणपती सात दिवस होते. सातही दिवस मी हर्षवायू झाल्यासारखा करत होतो. आणि परत सातव्या दिवशी ’दिवस किती भरभर संपतात’ही कुरकूर!

आमच्याकडचा गणपती हा परंपरेने चालत आलेला. त्यामुळे केवळ हौसेच्या, उत्साहाच्या भरातही आजी, आई सोवळं, काही नियम पाळायला लावायच्या. सोवळ्यात नसताना गणपतीच्या जवळजवळ जायचं नाही, नैवेद्य दाखवायच्या आधी मोदकांवर डोळा ठेवायचा नाही वगैरे वगैरे. या गोष्टी साध्याच असतात पण त्याचं स्तोम न माजवता त्यामागची भावना लक्षात घेतली की उत्सवाचा आनंद वाढतोच.

गणपती बसविण्यापासून ते विसर्जनाच्या दिवशी गणपतीच्या हातावर दही घालेपर्यंत, सगळं काही साग्रसंगीत होतं. आणि हो, हव्या असणाऱ्या, नको असणाऱ्या सगळ्या गोष्टींच्या यादीचं पठण बाप्पासमोर अथर्वशीर्षाच्या आवर्तनांपेक्षा जास्त वेळा झालेलं असतंच. आजकाल बहुतेक सर्वच सर्व गणपती नवसाला पावणारे असतात, पण ह्या घरच्या गणपतीने मात्र नवस न करताच खूप काही भरभरुन दिलं आहे आतापर्यंत!

आमच्याकडचं डेकोरेशनही अगदी ठरलेलं. तेच पडदे, त्याच समया आणि त्याच सुरयांतून लावलेली फुलं. बालसुलभ उत्साहाच्या भरात फार पूर्वी कधीतरी एकदा मखर करायचा ’प्रयत्न’ केला होता. पण शेवटी जे काही तयार झाले होते ते पाहून परत त्याच्या वाटेला काही गेलो नाही. शिवाय पुढं ’थर्मोकोल एको फ़्रेंड्ली नसतो’ अशी सबळ कारणं मदतीला धावून आलीच!

ही सजावट साधीच असली तरीही एकदा का बाप्पा विराजमान झाले की सगळं काही बदलून जातं. जादूची कांडी फिरावी तसं. समयांचा मंद प्रकाश, धूपाचा दरवळणारा गंध, सुबक फुलं आणि सगळी सजावट फिकी पडावी अशी ती गणेशाची प्रसन्न तेजस्वी मूर्ती! क्षणभराचे हे दर्शनही माझी बॅटरी पुढच्या संपूर्ण वर्षासाठी चार्ज करतं.

आठवतंय तेव्हापासून सगळ्या उत्सवात ’गणेशोत्सव’ अति प्रिय. आणि याचं नेमकं कारण शब्दांत मांडणंही कठीण. आस्तिक-नास्तिक वादाची ओळख होण्याआधीच (म्हणजे थोडक्यात पुरेशी व्यावहारिक अक्कल येण्याआधी!) हा बाप्पा जीवनाचा अविभाज्य घटक बनला होता. बुद्धीदेवता, सर्व शास्त्रे-विद्या-कलांचा हा स्वामी. शक्तीबरोबरच युक्तीचाही डोस देणारा. माझा एक शंभर टक्के नास्तिक मित्र आहे. तो वर्षातून फक्त गणपतीचे दीड दिवस नास्तिक नसतो. नेमकं कारण त्यालाही सांगता येत नाही.

घरी राहायला आलेले आवडते पाहुणे जायला निघाले की लहान मुलं रडतात. मात्र गणपती निघाले की सगळ्यांच्याच पोटात कालवाकालव होते. त्यावर उपाय एकच, सगळ्यांच्या सुरात आपणही सूर मिसळायचा,
"गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या!"

1 comment:

कोहम said...

wah...chaan.....varnan avadala..kalavakalav hote khari...