Sunday, November 25, 2007

माझा वाचक वर्ग!

गेल्या काही दिवसात मला एक नविनच शोध लागलाय. आणि तो म्हणजे की माझा ब्लॉग नियमितपणे वाचणारी मंडळी अस्तित्त्वात आहेत!

हे म्हणजे सुक्याबरोबर ओलंही जळतं असा प्रकार झाला. एकाहून एक सरस लिहिणारी मंडळी आणि त्यांचे लिखाण बघूनच खरंतर माझ्या लिहिण्याचा उर्मीचा कडेलोट झाला होता. लता मंगेशकर गाते, तेव्हा गाण्याची ही एकच सोपी पद्धत आहे असा आपला समज होतो आणि तसं गाण्याचा प्रयत्न केला की आपलाच आवाज ऐकून तात्पुरतं बहिरेपण येतं. मराठीतून अत्यंत सुंदर ब्लॉग लिहिणारी मंडळी हा असलाच रोग पसरवतात. त्यांचे लिखाण वाचून लिहिणे म्हणजे सकाळी उठलो, दात घासले, आंघोळ केली, भांग पाडला, शर्ट घातला.... इतकी सोपी गोष्ट वाटते!

पण लिहायचा प्रयत्न तर करून पहा, बोटांचीपण दातखीळ बसते महाराजा.

नव्या नवलाईचे चार दिवस, कधीतरी सणासुदीला येणारा उत्साह किंवा ’केव्हातरी पहाटे’ खरंच काहीतरी लिहावसं वाटणं यापेक्षा चिरंतन आळस केव्हाही मोठा.

काही हुकुमी ब्लॉगर्सची नावं द्यावीत तर इतरांचा मुलाहिजा न ठेवल्यासारखं आणि सगळ्यांची नावं लिहायची म्हणजे आळसाशी प्रतारणा केल्यासारखं. पण सांगायचा मुद्दा असा की ही बडी मंडळी न सुचणाऱ्या विषयावरही इतकं सुंदर लिहितात की लिखाणाच्या नावाखाली पाट्या टाकणाऱ्या तमाम मंडळींनी आपले कीबोर्डस म्यान करावेत. मग आम्हीही म्हणतो, तानसेन नाही म्हणून आम्ही काय गाउच नये?

असल्या गाण्याने इतरांचे कान किटतील ही भीती नाही पण काही वेळा जरा जास्तच विचार केला जातो की लिहितोय यात निदान किमान क्वॉलिटी असावी. कोणी सांगितले आहेत हे उपद्व्याप असंही वाटतं. हे जेव्हा मी एका मैत्रिणीला सांगितलं तर ती म्हणाली की मी जर एव्हढा विचार केला तर लिहूच शकणार नाही. यावर सोपा उपाय म्हणजे जे वाटतंय ते लिहून मोकळं व्हायचं! हे बाकी उत्तम. एकदा खरडून झालं की आपली पोटदुखी बंद. मग इतरांचा विचार? असो, जर पुढेमागे अगदी घरावर मोर्चा वगैरे आला तर त्याचाही विचार करु.

तर माझा वाचक-वर्ग मी पुढची पाटी कधी टाकतो याची वाट बघतो म्हणे. काही मित्र-मैत्रिणींनी कमेंट्सच्या माध्यमातून ’समज’ही दिली! (असल्या कमेंट्स कधी पब्लिक करायच्या नसतात, नाहीतर तो एक जाहीर वस्त्रहरणाचा कार्यक्रम होईल!) शिवाय हा आता आंतरराष्ट्रीय मुद्दा होऊ पाहत आहे. (माझ्या अमेरिकेतल्या बहिणीने पुण्यातल्या भावाला मेल करून, मला वरचेवर लिहित जा, ही ’समज’ प्रत्यक्ष भेटून द्यायला सांगतली आणि त्यानी हा मेल नेमका सिंगापूरमधील दोन दिवसांच्या वास्तव्यात वाचला.)

असो. सध्या मी थोडा उत्साहात आहे. आजच गिटारवरची धूळ झटकली आहे. जिमला निदान पुढचा आठवडा तरी न चुकता जायचं ठरवलंय. थोडं लिहायचंही ठरवलंय. बघूया काय काय पार पडतंय!

7 comments:

a Sane man said...

:D

rayshma said...

that's d best thing! blog abt WHATEVER u feel like! and yeah, keep political/religious issues out. naahitar sena bhavan gharachya javalach aahe na tujhya? ;)
and don't worry... u shall keep recvng reminders...;)

A woman from India said...

तुमच्या वाचकवर्गात मी ही आहे.
प्रतिक्रिया देत नसले तरी वाचते. तुम्ही मात्रं आवर्जुन माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देता याबद्दल आभार.

rayshma said...

hello..? if u're gymming with the frequency of ur blogging... i can see where u're going with it... ;)
where's the next piece?? :P

rayshma said...

okay... i think u shall react only if i write in marathi! :P so here goes:
vaachak varga vaat pahtoy. lavkar next piece write kar...:P

p.s.: i know d marathi equivalent for write, but dunno how to write it in english!

TheKing said...

Before you plan any serious action on my laziness, I promise, the next post is coming before that..

Sneha said...

तुझ्या blog ची नवीन वाचक आहे... वाचनीय वाटला मला... असच लिहित जा... आणी मी खरड्लेल वचायच असेल तर माझ्या blogला
भेट दे... :)
http://www.shodhswatahacha.blogspot.com/